Blog

रायगड लोकधारा वृत्तसेवा :

महाड प्रतिनिधी : रायगड-अलिबाग,दि.९ ( जिमाका ): ग्रंथसंस्कृतीचा वारसा जपणे आणि वाचन चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवणे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्या वतीने ‘ग्रंथोत्सव २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड येथे गुरुवार, दि. १२ आणि शुक्रवार, दि. १३ मार्च २०२६ रोजी हा ज्ञानोत्सव रंगणार आहे.

ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवशी, गुरुवार दि. १२ मार्च रोजी सकाळी ९:३० वाजता भव्य ग्रंथदिंडी निघणार आहे. महाडचे नगराध्यक्ष श्री. सुनिल कविस्कर, उपविभागीय अधिकारी श्री. पोपटराव ओमासे आणि उपनगराध्यक्ष श्री. संदिप जाधव यांच्या शुभहस्ते या दिंडीचे उद्घाटन होईल. यावेळी ग्रंथालय संचालक श्री. अशोक मा. गाडेकर, सहायक ग्रंथालय संचालक श्री. प्रशांत व. पाटील, पोलीस उपअधीक्षक श्री. शंकरराव भा. काळे, श्रीमती शोभाताई सावंत, श्रीमती सीमाताई मपारा, श्री. गंगाधर साळवी आणि श्री. प्रकाश जमदाडे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असेल.

सकाळी ११:०० वाजता मुख्य उद्घाटन समारंभ संपन्न होईल. या सोहळ्याला राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कु. अदिती तटकरे आणि मंत्री श्री. भरत गोगावले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याप्रसंगी जिल्ह्यातील खासदार श्री. सुनील तटकरे, श्री. श्रीरंग बारणे, श्री. धैर्यशील पाटील आणि आमदार सर्वश्री प्रशांत ठाकूर, रवींद्र पाटील, महेंद्र थोरवे, महेश बालदी, महेंद्र दळवी, निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे व विक्रांत पाटील उपस्थित राहतील. प्रशासकीय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी श्री. किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले आणि पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांचीही उपस्थिती असेल.

या ग्रंथोत्सवात ग्रंथप्रेमींना दोन्ही दिवस वैचारिक मेजवानी मिळणार आहे.

गुरुवार, १२ मार्च: ज्येष्ठ साहित्यिक अ‍ॅड. श्री. विलास नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सत्राचे आयोजन करण्यात आले असून, श्री. प्रभाकर भुस्कुटे आणि प्रा. डॉ. रवींद्र सोमोशी हे प्रमुख अतिथी असतील. दुपारी उत्कृष्ट वाचकांचा सन्मान आणि त्यानंतर डॉ. श्री. विष्णू सुरासे यांचा ‘तणावमुक्त आनंदी जीवनाचा मूलमंत्र’ हा विनोदी साहित्य वाचनाचा कार्यक्रम होईल.

शुक्रवार, १३ मार्च: दुसऱ्या दिवशी सकाळी ९:०० वाजता जि. प. शाळा आसणपोईच्या विद्यार्थ्यांचे पथनाट्य होईल. त्यानंतर ‘वाचन संस्कृतीचे पाईक – सार्वजनिक ग्रंथालये’ या विषयावर श्री. चांगदेव काळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद रंगेल, ज्यामध्ये श्रीमती शैलाताई पाटील, श्री. रामदास गायकवाड, प्रा. श्री. भाऊसाहेब नन्नावरे आणि श्रीमती सीमा मपारा सहभागी होतील.

दुपारी प्रा. यशवंत गोसावी हे ‘कुशल प्रशासक – लोकमाता अहिल्याबाई होळकर’ या विषयावर व्याख्यान देतील. दुपारी श्री. चारुदत्त चिखले रचित ‘ही माती माझ्या यात्रेची विठाई’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन होईल. त्यानंतर प्रा. एल. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भव्य काव्यवाचन सोहळा संपन्न होईल.

काव्यवाचन सत्रात श्री. रमेश धनावडे, श्री. नंदू तळकर, श्री. जितेंद्र ओक, श्री. हेमंत बारटक्के, डॉ. सुभाष कटकदौंड, श्री. शरद कोरडे, श्री. पा. शि. पाटील, श्रीमती प्रतिक्षा नगरकर, श्रीमती प्रिया शहा, श्री. कैलास पिंगळे, श्रीमती दिप्ती कुलकर्णी, श्री. वैभव घनावडे आणि श्रीमती शीतल गांधी हे कवी सहभागी होणार आहेत.

त्याचबरोबर या दोन दिवसात ग्रंथांचे भव्य प्रदर्शन व विक्री कार्यक्रमस्थळी होणार असून येथे सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.

या कार्यक्रमाचे नियोजन सहायक ग्रंथालय संचालक श्री. प्रशांत व. पाटील आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री.अजित ब. पवार यांनी केले असून या ग्रंथोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन रायगड ग्रंथोत्सव समितीने केले आहे.