रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पनवेल प्रतिनिधी अशोक घरत : कोन (ता.पनवेल) येथे नवतरुण बौद्ध मित्र मंडळ, यशोधरा महिला मंडळ व भीमरत्न युवक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तसेच तथागत भगवान गौतम बुद्ध व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन मंगळवार, दि. १४ एप्रिल २०२६ रोजी बुद्ध विहार येथे मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात पंचशील ध्वज व निळ्या ध्वजाच्या ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर बुद्धपूजा पाठ करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व भगवान बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक आदरणीय विजय रघुनाथ गायकवाड होते. यावेळी सरपंच सौ. अश्विनी जितेश शिसवे, गोविंद दामू पाटील (मा. सदस्य, ग्रामपंचायत),पत्रकार अशोक ना. घरत, अॅड. गायकवाड सर, ग्रामसेवक रमेश तारेकर,जितेश बा.शिसवे (मा.उसरपंच),अक्षय मा.घरत (सदस्य),साहिल बा.म्हात्रे (सदस्य),अॅड.दत्तात्रेय पां.घरत,अॅड.अस्मिता कांबळे,
बाळाराम ना. कांबळे आणि सचिन ग.म्हात्रे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी पत्रकार अशोक घरत यांनी प्रभावी व विचारप्रवर्तक भाषण करत उपस्थितांना प्रेरित केले. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात काव्यात्मक शैलीत करत समाजाला जागृत करण्याचा संदेश दिला —
जयघोष नको नुसताच
विचार पाहिजे घ्यायला
घराघरात भीमसैनिक
तयार पाहिजे व्हायला
भीमराव म्हणजे काय
सर्वांना हवे कळायला
संविधानाच्या मार्गावर
पाऊल हवे वळायला…
या ओळींमधून त्यांनी केवळ घोषणांपुरते मर्यादित न राहता बाबासाहेबांचे विचार आचरणात आणण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा बाबासाहेबांचा मंत्र आजही तितकाच महत्त्वाचा असून समाजातील प्रत्येकाने शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले.
तसेच त्यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून प्रत्येक नागरिकाला समान हक्क, स्वातंत्र्य व न्याय देणारे एक शक्तिशाली साधन आहे. समाजातील अंधश्रद्धा, जातीय भेदभाव व असमानता दूर करण्यासाठी प्रत्येकाने जागरूक नागरिक म्हणून भूमिका बजावली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
त्यांनी पुढे सांगितले की, बाबासाहेबांचे स्वप्न होते असा भारत निर्माण करणे,जिथे प्रत्येक माणूस समानतेने जगेल. हे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यांच्या भाषणाने उपस्थितांमध्ये विचारांचा जागर निर्माण झाला.
भाषणाच्या शेवटी त्यांनी काव्यात्मक शैलीत भावपूर्ण संदेश देत उपस्थितांना प्रेरित केले —
सांभाळा जपून हा ठेवा, संविधानाचा अमूल्य वारसा
भीमरावांनी दिला आपुला, समतेचा सुंदर आरसा
विचारांचा वारसा जपूया, समतेचा मार्ग स्वीकारूया !
या ओळींनी कार्यक्रमाला भावनिक व प्रेरणादायी उंची मिळाली.
यानंतर इतर मान्यवरांनीही जयंतीनिमित्त थोडक्यात मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत कांबळे यांनी उत्कृष्टरीत्या केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला असून गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

