Blog

रायगड लोकधारा वृत्तसेवा :

मुंबई प्रतिनिधी : सतिश पाटील कल्याण : कल्याण-शीळ रस्ता हा आता या परिसरातील नागरिकांसाठी रोजचा शाप बनला आहे. या मार्गावर होणाऱ्या भीषण आणि जीवघेण्या वाहतूककोंडीमुळे स्थानिक लोकांचे आयुष्य अक्षरशः बेजार झाले आहे. सामान्य माणूस रोजच्या प्रवासात आपला मौल्यवान वेळ, पैसा आणि आरोग्य गमावत असताना, दुसरीकडे दलाल, बांधकाम व्यावसायिक, तथाकथित कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि राज्यकर्ते यांना मात्र याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचे अत्यंत संतापजनक चित्र उघड झाले आहे.

कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई आणि ठाण्याला जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. मात्र, या मार्गावर दररोज तासनतास गाड्यांच्या रांगा लागलेल्या असतात. नोकरदार वर्ग, विद्यार्थी आणि अगदी जीवन-मरणाच्या दारात असलेल्या रुग्णांच्या रुग्णवाहिका देखील या कोंडीत अडकून पडतात. नागरिकांचा रोजचा हा मानसिक आणि शारीरिक छळ होत असताना प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना जाग का येत नाही, हा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

विकासाच्या नावाखाली बिल्डरांचे उखळ पांढरे

एकीकडे या परिसराचा वेगाने ‘विकास’ होत असल्याचा गवगवा केला जातो. बांधकाम व्यावसायिक आणि त्यांचे दलाल येथे मोठ्या गृहप्रकल्पांची आणि ‘कनेक्टिव्हिटी’ची खोटी स्वप्ने विकून करोडो रुपये कमवत आहेत. मात्र, वाढत्या लोकसंख्येला साजेसा रस्ता आणि पायाभूत सुविधा देण्याकडे त्यांनी सोयीस्कर डोळेझाक केली आहे. बिल्डरांचे उखळ पांढरे होत असले, तरी या नियोजनाअभावी निर्माण झालेल्या नरकयातना मात्र इथल्या भूमिपुत्रांना आणि रहिवाशांना भोगाव्या लागत आहेत.

लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची सोयीस्कर चुप्पी

सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे, जनतेच्या प्रश्नांवर गळे काढणारे कार्यकर्ते आणि जनतेच्या मतांवर निवडून आलेले लोकप्रतिनिधी या गंभीर समस्येवर मूग गिळून गप्प आहेत. निवडणुका आल्या की आश्वासनांची खैरात वाटणारे राज्यकर्ते, सत्तेत बसल्यावर या रस्त्यावरील कोंडी पूर्णपणे विसरतात. बिल्डर लॉबी, प्रशासन आणि राजकीय नेते यांचे साटेलोटे असल्यामुळेच या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची दाट चर्चा आता जनमानसात आहे.

जनतेच्या उद्रेकाची वाट पाहू नका !

कल्याण-शीळ रस्त्यावरील ही कोंडी केवळ एक वाहतूक समस्या राहिलेली नाही, तर तो या व्यवस्थेचा सामान्य माणसावर होणारा अन्याय आहे. ही परिस्थिती अशीच राहिली आणि दलाल व बिल्डरांचेच हित जपले गेले, तर जनतेचा हा दबलेला असंतोष लवकरच रस्त्यावर उतरेल. केवळ कागदी आश्वासने नकोत, तर या रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी तीव्र मागणी आता जोर धरू लागली आहे.त्यात आणखी भर बेशिस्त वाहन चालक विरूध्द दिशेने चालणे, शिस्तीचे पालन न करणे हे कधी थांबणार का ?

सामाजिक कार्यकर्ते : महेंद्र पाटील निळजे