रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पत्रकार कैलासराजे घरत / खारपाडा पेण
सध्याच्या चालू घडामोडीबद्दल भोंदू बाबांवर विश्वास ठेवून आजच्या AI युगात स्वतःला सुशिक्षित समजणाऱ्या काही मोजक्या महिला भोंदू बाबांच्या मायाजालात अडकतातच कशा? यांना सुशिक्षित म्हणावे की सुशिक्षित अडाणी..तेच कळत नाही. जिथं कुंपणच
शेत खातय, तिथे दाद मागायची कुणाकडे ? अक्षरश: कीव येते. त्या सर्वांनी बहिणाबाईंची खालील कविता अवश्य वाचावी. यावेळी मला कोणत्याही शाळेत न जाता जीवनाचे तत्त्वज्ञान कवितेच्या माध्यमातून साध्या सोप्या पद्धतीने अहिराणी भाषेत मांडणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी आठवतात…त्यांना हे खूप अगोदरच कळलं होत म्हणूनच तर त्यांनी ही काव्य रचना केली…त्यांची “नको नको ज्योतिषा” ही कविता अंधश्रद्धेवर प्रहार करणारी आणि आत्मविश्वासाची प्रेरणा देणारी एक प्रसिद्ध अहिराणी कविता आहे. यामध्ये त्या दारी आलेल्या ज्योतिषाला हात न दाखवता, स्वतःचे नशीब स्वतःच्या कष्टाने घडवण्यावर विश्वास व्यक्त करतात. बहिणाबाईंची कविता…. “नको नको ज्योतिषा”
कवयित्री बहिणाबाई चौधरींची “नको नको ज्योतिषा” ही कविता अंधश्रद्धा आणि नशिबावर विसंबून राहण्याऐवजी स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवण्याचा संदेश देते. अहिराणी भाषेतील या कवितेत, ‘दैव'(नशीब) स्वतःच्या हातात असते आणि कष्टानेच खरे ‘धन’ निर्माण होते, असे त्यांनी ज्योतिषाला ठामपणे सांगितले आहे.
बहिणाबाईंची कविता : नको नको ज्योतिषा (काव्यरचना)
“नको नको रे ज्योतिषा,माह्या दारी नको येऊ ! माह्य दैव मले कळे, माह्या हात नको पाहू !
धनरेषांच्या चऱ्यांनी, तळहात रे फाटला!
देवा तुह्याबी घरचा, झरा धनाचा आटला !
म्हणे नशिबाचे नऊ ग्रह, तळहाताच्या रेघोट्या!
बापा नको मारू थापा, अशा उगा खऱ्या-खोट्या !”
कवितेचा अर्थ व संदर्भ : अंधश्रद्धेला नकार: बहिणाबाईंनी भोंदूगिरीवर प्रहार करत, दारी आलेल्या ज्योतिषाला हात दाखवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. कष्टाचे महत्त्व: त्या म्हणतात की, नशीब हे हातावरील रेषांवर नसते, तर कष्टाने (घाम गाळून) तळहातावरील रेषा उमटतात. आत्मविश्वास: ‘माझे दैव मला कळे’ (माझे नशीब मला माहित आहे) यातून त्यांचा स्वतःवर आणि कष्टावर असलेला प्रचंड विश्वास दिसून येतो. हे काव्य खानदेशी (अहिराणी) बोलीभाषेत असून, मानवी जीवनातील कष्टाचे महत्त्व सांगणारी एक अमूल्य रचना आहे. बहिणाबाईंची स्वतःवरील आत्मविश्वासाची, दूरदृष्टीची ओळख होते.
