रायगड लोकधारा वृत्तसेवा :
अविनाश जाधव / कळंबोली पनवेल प्रतिनिधी :- पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वाढत्या वाहतूक कोंडी व प्रदूषणाच्या समस्येवर कायम स्वरुपी उपाय काढण्यासाठी ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पाची संकल्पना पुढे येत आहे. शिवसेनेच्या कळंबोली प्रभाग ८ च्य नगरसेविका सायली सरक यांनी हा अभिनव प्रस्ताव मांडला असून, शहराच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेसाठी तो महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे.
खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल आणि पनवेल या भागांमध्ये दिवसेंदिवस वाहनांची संख्या सतत वाढत असून, त्यामुळे वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषण यावर गंभीर समस्या बनली आहे. यावर शाश्वत उपाय म्हणून पॉड टॅक्सी प्रणाली प्रभावी ठरू शकते, असे मत सायली सरक यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात त्यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या प्रकल्पाबाबत सरनाईक यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली असून, पनवेलमध्ये पॉड टॅक्सी सुरू करण्याबाबत अनुकूलता दाखवली आहे. तसेच, नगरसेविका सरक यांनी महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील आणि महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनाही यासंदर्भात निवेदन दिले आहे. शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता, भविष्यातील गरज ओळखून पालिकेमार्फत लवकरच सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यानुसार पॉड टॅक्सी प्रकल्प राबविण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. दरम्यान, या उपक्रमावेळी कळंबोली शिवसेना शहर प्रमुख तुकाराम सरक यांच्यासह श्रीकांत फाळके, महेश गोडसे, निलेश दिसले, प्रेम डांगे, प्रेम गोडसे, सुनील खताळ, अंकित सरगर आदी शिवसैनिक उपस्थित होते. शहराच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
