⭕ रायगड लोकधारा वृत्तसेवा :
कागदी ( छापील ) लग्न पत्रिकाचा ट्रेंड पडला पाठीमागे…
ऑनलाईन डिजिटल लग्न पत्रिकेमुळे वेळ व पैशाची होते बचत….
प्री वेडींग शूटिंगचेही प्रमाण वाढले…
उरण दि. २९ विठ्ठल ममताबादे : भारतात अनेक परंपरा व रीती रिवाज आहेत. भारतीय संस्कृतीत लग्न हा एक संस्कार मानला गेला आहे. कालांतराने लग्न व त्या संबंधित काही रितिरिवाज मध्ये बदल घडत होत आहेत. लग्न म्हणजे लग्न पत्रिका आली. लग्न पत्रिके शिवाय लग्नाचा विचार करूच शकत नाही. लग्नाचा अविभाज्य घटक म्हणजे लग्न पत्रिका. पूर्वी घरोघरी जाऊन लग्न पत्रिका देऊन घरातील नातेवाईक, मित्र मंडळी यांच्याशी योग्य तो संवाद साधला जायचा. अगोदर लग्न या महत्वाच्या विधी पूर्वी लग्नाची छापील लग्न पत्रिका हे नातेवाईकांच्या घरी प्रत्यक्ष भेट देत दारात अक्षता ठेवून दिले जायचे. बदलत्या काळात छापील लग्न पत्रिकाची जागा आता डिजिटल लग्न पत्रिकेने घेतली आहे. आता तरी लग्नपत्रिका ही ऑनलाईन झाल्याने कागदी लग्नपत्रिकांचा ट्रेंड मागे पडत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे. अलीकडच्या काळात तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली यामुळे प्रत्येक क्षेत्रात आमुलाग्र बदल झाला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात निमंत्रणही ऑनलाईन झाले आहे. पूर्वीच्या काळी नातेवाईकांच्या घरी जाऊन निमंत्रण दिले जात होते त्यानंतर साध्या पद्धतीच्या पत्रिका छापून घरपोच घेऊन जायची या निमंत्रण नातेवाईक सन्मानाची निमंत्रण समजत होते. त्यामुळे पूर्ण कुटुंब त्या कार्यात सहभागी होत असे. आता ऑनलाईन पत्रिका पाठविण्याचे ट्रेंड सुरु आहे. लग्नाच्या अगोदर इच्छुक पती पत्नी यांना एकत्र बोलावून फोटो काढण्याचे प्रमाण वाढले आहे. याला प्री वेडींग शूटिंग असे म्हणतात. प्री वेडिंग शूटिंगचे मार्केट झपाट्याने विस्तारत असताना ऑनलाईन निमंत्रण देण्याला चांगलेच महत्त्व आले आहे. विशेषत: तरुणांचा सोशल साइटवर डिजिटल लग्न पत्रिका टाकण्याकडेही कल वाढला आहे. विशेष म्हणजे लिखित पत्रिकेची थेट दृकश्राव्य स्वरूपातील निमंत्रण दिले जात आहे.
मोबाईल क्रांतीचा फायदा :- पूर्वी घरोघर आणि गावोगावी जाऊन लग्नपत्रिका वितरित करावी लागत असेल लग्नाचे दिवस जसे जवळ आले त्यात कोणाकडे निमंत्रण पत्रिका पोहोचली नाही याची चिंता लागलेली असायची.आता मोबाईल क्रांतीमुळे ही चिंता मिटली आहे. शिवाय ऑनलाइन पत्रिकांचे विविध प्रकार उपलब्ध असल्याने पत्रिकेत पाहिजे तसे बदल करता येतात. नवनवीन पद्धतीचा नागरिकांनी स्वीकार केला असून नागरिकांनी चालत्या काळानुसार व गरजेनुसार बदल स्वीकारल्याने लग्न पत्रिकेचा अदृहास आताच कमी होत चालल्याचे चित्र आहे.
खर्चात झाली बचत :- सोशल मीडियावर लग्न पत्रिका पाठवून फोन करून कळविली जाते. त्यामुळे शेकडो पत्रिका छापण्यात येणाऱ्या लग्न पत्रिका आता केवळ ५०-१०० छापल्या जात असल्याने आता लग्न पत्रिका प्रत्यक्ष भेटून देण्याची पद्धत मागे पडू लागली आहे.
कोट (चौकट ):- “माझ्या लग्नाला व्हाट्सअप सारख्या सोशल मीडियाच्या प्लॅट फॉरवर आमंत्रण देण्यामुळे प्रचंड वेळ वाचला आणि सर्वांनी हजेरी लावली. खर्चही कमी प्रमाणात झाला. यास नातेवाईकासह मित्रमंडळींनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. सोशल मीडियाचा वापर केल्याने माझा वेळ व पैशाची बचत झाली आहे. शिवाय चांगला प्रतिसादही मिळाला आहे.” – संगम पाटील, उरण
