रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पत्रकार कैलासराजे घरत / खारपाडा पेण :
राजाभाऊ मंगळवेढेकर यांचा आज स्मृती दीन. जन्म: ११डिसेंबर१९२५, मृत्यू: १ एप्रिल२००६
“असावा सुंदर चॉकलेटचा बंगला…. चंदेरी, सोनेरी चमचमता चांगला….”
ही ओळ कानावर पडताच मन आपोआप बालपणाच्या गोड आठवणीत हरवून जाते. चॉकलेटच्या बंगल्याची, टॉफीच्या दरवाज्याची आणि गोड स्वप्नांनी भरलेल्या त्या निरागस जगाची पुन्हा एकदा सफर सुरू होते. या गाण्याने केवळ लहान मुलांनाच नाही तर प्रत्येक वयोगटातील माणसाला त्याच्या बालपणाच्या सुंदर क्षणांशी जोडून ठेवले आहे. त्या कल्पनारम्य आणि आनंदी विश्वाला शब्द देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे राजाभाऊ मंगळवेढेकर. ११डिसेंबर१९२५ रोजी जन्मलेल्या आणि १एप्रिल २००६ रोजी आपल्यातून निघून गेलेल्या राजाभाऊंनी आपल्या लेखनातून मराठी बालसाहित्याला एक वेगळी उंची दिली. त्यांचे खरे नाव वसंत नारायण मंगळवेढेकर असले तरी “राजा मंगळवेढेकर” या टोपणनावाने त्यांनी साहित्यविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या लेखनात बालमनाचा निरागसपणा, स्वप्नांची उंच भरारी आणि जीवनातील साधेपणा अतिशय सुंदरपणे प्रतिबिंबित होतो. राजाभाऊंच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांना लाभलेला साने गुरुजी यांचा सहवास. स्वातंत्र्यचळवळीच्या काळात त्यांच्याशी आलेल्या संपर्काने राजाभाऊंच्या विचारविश्वाला दिशा मिळाली. “करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल प्रभूशी नाते तयाचे” या साने गुरुजींच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य बालकांच्या आनंदासाठी आणि त्यांच्या संवेदनशील घडणीसाठी समर्पित केले. मराठी साहित्याच्या विविध प्रकारांमध्ये बालसाहित्य हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि आनंददायी प्रकार मानला जातो. लहान मुलांसाठी लिहिलेली बडबडगीते, कविता, नीतिकथा, साहसकथा आणि प्रवासवर्णने यांमधून केवळ मनोरंजनच होत नाही, तर मुलांच्या मनावर चांगले संस्कारही घडतात. राजाभाऊ मंगळवेढेकर यांनी या क्षेत्रात अतिशय मोलाची भर घातली. त्यांनी केवळ बालसाहित्यकार म्हणूनच नव्हे, तर कवी, नाटककार, अनुवादक आणि विज्ञान पर्यावरण विषयांवर लेखन करणारे चतुस्त्र लेखक म्हणूनही आपली छाप उमटवली. त्यांच्या लेखनाचा व्याप अत्यंत व्यापक होता. त्यांनी २०० हून अधिक पुस्तकांची निर्मिती केली, ज्यामध्ये चरित्रे, निसर्ग, विज्ञान, समाज आणि राष्ट्रपुरुषांच्या जीवनावर आधारित साहित्याचा समावेश होता. मुलांना सुलभ आणि समजण्यास सोप्या भाषेत त्यांनी सुलभ रामायण, सुलभ महाभारत, तसेच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांची जीवनचरित्रे लिहिली. या माध्यमातून त्यांनी मुलांना इतिहास, संस्कृती आणि मूल्यांची ओळख करून दिली.
राजाभाऊंच्या साहित्याची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाजू म्हणजे त्यांच्या अनुभवांचा व्यापक पट. कथाकथन, बालमेळावे आणि शिबिरांच्या निमित्ताने त्यांनी संपूर्ण भारतभर प्रवास केला. या प्रवासातून त्यांनी मिळवलेले अनुभव त्यांच्या लेखनात सहजपणे उतरले. त्यामुळे त्यांच्या कथा केवळ कल्पनारम्य न राहता वास्तवाशी जोडलेल्या आणि प्रेरणादायी बनल्या. त्यांनी जागतिक साहित्याचा परिचय मराठी वाचकांना करून देण्याचे कार्यही केले. रॉबर्ट लुई स्टीव्हन्सन यांच्या प्रसिद्ध कादंबरीचा ‘बारकू’ या नावाने केलेला मराठी अनुवाद हा त्याचाच एक उत्कृष्ट नमुना आहे. त्यांच्या लेखनातून मुलांना केवळ आनंदच नाही, तर विचार करण्याची आणि जग समजून घेण्याची दृष्टीही मिळते. “कथा आणि कथाकथन” हे त्यांचे पुस्तक आजही कथाकथन करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक मानले जाते. या पुस्तकात त्यांनी कथाकथनाची तंत्रे अत्यंत सोप्या आणि प्रभावी पद्धतीने सांगितली आहेत. या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कारही प्राप्त झाला आहे. तसेच त्यांच्या साहित्यसेवेसाठी त्यांना जवाहरलाल नेहरू समिती पुरस्कार, गदिमा पुरस्कार आणि बालसेवा पुरस्कार अशा अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले.
राजाभाऊ मंगळवेढेकर यांनी आपल्या लेखनातून मराठी साहित्याला समृद्ध केले आणि बालसाहित्याला एक वेगळी प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या शब्दांनी लाखो बालकांच्या मनात आनंद, स्वप्न आणि संस्कारांची बीजे पेरली. आजही त्यांचे साहित्य तितकेच ताजे, जिवंत आणि प्रेरणादायी वाटते. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करताना एवढेच म्हणावेसे वाटते की, त्यांनी उभा केलेला “चॉकलेटचा बंगला” आजही प्रत्येकाच्या मनात तितकाच गोड, सुंदर आणि चमचमीत आहे.
