रायगड लोकधारा वृत्त :
महाड प्रतिनिधी : किल्ले रायगडावर आज छ. शिवाजी महाराजांची ३४५ वी पुण्यतिथी श्री. शिवाजी रायगड स्मारक स्थानिक उत्सव समिती मार्फत आयोजित करण्यात आली होती. यावेळी छ शिवाजी महाराजांना हजारो शिवभक्तानी अभिवादन केले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छ. शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरते सीमित न ठेवता त्यांची कीर्ती जगभर नेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे प्रतिपादन केले.
यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले, चंद्रकांत पाटील, उदयनराजे भोसले, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, महिला बाल कल्याण मंत्री आदीती तटकरे, आ. प्रशांत ठाकूर, आ.महेश बालदी, खा. धैर्यशील पाटील उपस्थित होते. आपल्या प्रास्तविक पर भाषणात स्थानिक उत्सव समितीचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे यांनी समितीच्या कार्याचा आढावा मांडला. यावेळी आपल्या भाषणामध्ये अमित शाह यांनी ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुवर्ण सिंहासन प्रस्थापित केले त्या भूमीमध्ये आल्यानंतर आपल्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही असे सांगून ज्यांनी भारतातील कणाकणात स्वधर्म, स्वभाषा आणि राष्ट्रासाठी जीव देण्याची निष्ठा निर्माण करण्याचे काम केले त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अटक ते कटक, बंगाल पर्यंत, दक्षिण मध्ये तामिळनाडू पर्यंत, ते थेट गुजरातपर्यंत हिंदवी स्वराज्याची संकल्पना पोहोचवली. किल्ले रायगड हे पर्यटन स्थळ नसून प्रेरणास्थळ बनवण्याचे काम आपण केले पाहिजे असे सांगून छत्रपती शिवरायांचा विचार केवळ महाराष्ट्रात होता सीमित न ठेवता जगभरात गेला पाहिजे असा प्रतिपादन देखील नामदार अमित शाह यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपले सरकार छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालणारे सरकार असल्याचे सांगून छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीतील लोकांना एकत्रित करून भगवा झेंडा अटकेपार नेण्याचे काम केले. छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना टकमक टोक दाखवले पाहिजे असा सज्जड दम देत शासनाकडून छत्रपती शिवरायांचा इतिहास प्रसिद्ध केला जाईल असेही सांगितले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवरायांनी तलवारीच्या बळावर निष्पाप लोकांवर अन्याय न करता तलवारीला या निष्पाप लोकांचे रक्त लागू दिले नाही तर या तलवारीला मानवतेचा सुगंध आहे असे सांगून महाराष्ट्रात वाढत चाललेली विषवल्ली ठेचून काढली पाहिजे असे प्रतिपादन केले. यावेळी उदयनराजे भोसले यांनी देखील विविध मागण्यासह आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी दुर्गअभ्यासक नीलकंठ रामदास पाटील यांना यावर्षीचा श्री शिवस्मृती रायगड स्मृती पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. तर होळकर घराण्याचे वारसदार उदयसिंह होळकर, भारतीय सैयदलाचे अधिकारी लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी, यांचा देखील सन्मान करण्यात आला. यावेळी शिवराय मुद्रा स्मरणीका, आणि धर्मयोगीनी अहिल्या होळकर पुस्तक प्रकाशन देखील करण्यात आले. सुरक्षेचा अतिरेक – स्थानिकांसह शिवप्रेमींना त्रास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांसह मुख्यमंत्री आणि अनेक विभागाचे मंत्री, आमदार याठिकाणी उपस्थित राहिल्याने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. गडावर राजसदर परिसरात चप्प्पल आणि इतर पाद त्राने देखील बाहेर काढुन ठेवण्यास भाग पाडले. शिवाय गॉगल, पेन इतर साहित्य देखील सोबत नेण्यासाठी मनाई करण्यात आली. यामुळे राजसदर परिसरात शिवप्रेमीची कमतरता जाणवली. राज सदर परिसरात मोजकेच शिवभक्त उपस्थित होते. त्यातच या शिवभक्तांना नगारखान्याच्या बाहेर चपला काढण्यास भाग पाडले. शिवाय सकाळी आठ वाजता राजे सदरेत कार्यक्रमाला बसलेल्यांना बाहेर पडून दिल्याने अनेकांची कुचंबना झाली.
यावर्षी केंद्रीय उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नाने शिवसमाधीवर हेलीकॉप्टर द्वारे पृष्पवृष्टी करण्यात आली.

