रायगड लोकधारा वृत्तसेवा :
रायगड लोकधारा प्रतिनिधी l उरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांचे प्रेरणास्थान, राष्ट्रीय नेते स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेब यांचे नाव मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी यापुढे लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा लोकनेते दी. बा पाटील भूमिपुत्र सामाजिक संस्था शिवभूमी रायगड -नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्र समितीचे कार्याध्यक्ष -सचिन केणी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला असून दिनांक ८ जुलै रोजी पनवेल शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी सामील झालेल्या सर्व आंदोलक, ग्रामस्थ, स्थानिक भूमिपुत्र, विविध सामाजिक संस्था संघटना यांचे सचिन केणी यांनी जाहिर आभार मानले.येत्या ३ महिन्यात नाव न दिल्यास गनिमी काव्याने लढून दिबा पाटील साहेबांचे नाव लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा निर्धार सचिन केणी यांनी केला आहे.
सर्व भूमिपुत्र, बंधू आणि भगिनींनी दाखवलेल्या अभूतपूर्व एकतेचे मनापासून आभार.पाऊस, पाणी किंवा कोणतीही परवानगी नसतानाही केवळ आपल्या हक्कासाठी आणि दिबा साहेबांच्या सन्मानासाठी तुम्ही सर्वजण या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झालात.त्यामुळे सर्वांचे पुन्हा एकदा आभार या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रशासनाला आणि सरकारला आमची नम्र विनंती आहे की, आमच्या संयमाचा अंत पाहू नका. आमचा आगरी-कोळी, कराडी,समाज आणि ५ जिल्ह्यांतील तमाम भूमिपुत्र आपल्या न्याय्य हक्कांसाठी कोणत्याही थरापर्यंत संघर्ष करण्यास सज्ज आहेत !
पुढील आंदोलनातही सर्वांनी अशाच प्रकारे मोठ्या संख्येने एकत्र यावे, हीच विनंती.शेवटचा मिशन येत्या ३ महिन्यात नवी मुंबई विमानतळ गनिमी काव्याने बंद करण्यात येईल त्यावेळेस राष्ट्रीयनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव जाहीर करण्यास सर्व भूमिपुत्र, केंद्र सरकारला भाग पाडणार.असा इशारा लोकनेते दि. बा पाटील प्रेमी नामकरण संघर्ष समिती तर्फे प्रशासनाला लोकनेते दी. बा पाटील भूमिपुत्र सामाजिक संस्था शिवभूमी रायगड -नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्र समितीचे कार्याध्यक्ष – सचिन केणी यांनी दिला आहे.
