रायगड लोकधारा न्यूज :
नवी मुंबई, पनवेल, प्रमोद पाटील : पार्टी म्हटलं तर मित्रांचा राडा आणि जल्लोष आलाच.मात्र याच मित्रांच्या जल्लोषात एका मित्रानेच मित्राची हत्या केल्याची दुदैवी घटना घडली आहे. चिकन पार्टीचे पैशावरून वाद झाला, या वादातूनच जयेश वाघे या तरूणाची हत्या करण्यात आली आहे. खारघरमधील बेलपाडा आदिवासी वाडीमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी मन्नू दिनेश शर्मा याच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, 23 जानेवारीला रात्रीची ही घटना आहे. खारघरमधील बेलपाडा येथील आदिवासी वाडीतील क्रिकेट मैदानाच्या बाजूच्या रस्त्यावर जयेश आणि त्याचे इतर मित्र चिकनची पार्टी करण्यासाठी चिकन बनवत होते. या पार्टीसाठी सर्वांनी पैसे काढले होते. मात्र मन्नू यांच्याकडून चिकनसाठी कोणतीही वर्गणी येत नव्हती. या कारणावरून जयेश आणि मन्नू यांच्यात वाद झाला होता. सुरूवातीला शाब्दीक वाद सूरू होता.यावेळी शिवीगाळ करण्यात आली होती. जयेशने मन्नू यांच्या कानाखाली मारली.याचाच राग आल्याने मनु याने जयेशला हाताबुक्क्यांनी छातीत आणि पोटावर मारहाण केली. त्यानंतर त्याने क्रिकेटच्या लाकडी बॅटने चेहऱ्यावर आणि पाठीवर हल्ला केला होता. या घटनेत जयेश हा गंभीररित्या जखमी झाला होता.याच अवस्थेत त्याला एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल करण्यात आले होते.मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. मृत जयेश हा पनवेल महानगर पालिका येथे मलनिसारण वाहनावर सफाईचे काम करत होता. दरम्यान या घटनेची तक्रार मिळताच पोलिसांनी आरोपी मन्नू शर्मा याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेने नवी मुंबई हादरली.
