रायगड लोकधारा न्यूज :
ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी केले प्रतिपादन
महाड पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
महाड : रघुनाथ भागवत -: पत्रकारांबद्दल आदरभाव कमी होत चालला आहे. समाजाने सुद्धा चांगल्या पत्रकारांना जगवले पाहिजे. पत्रकाराने ज्ञान आणि कौशल्य वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. सद्या विज्वल माध्यम आता प्रभावी होत चालले आहे. लोक सखोल वाचत नाही, वरवरचे वाचतात. ज्यांनी वाचायला पाहिजे ते लिहीत सुटतात. जे विद्वान आहेत ते वाचत सुटतात आणि विद्वान आणि हुशार लोक व्यक्त होत नाहीत. त्यामुळे पत्रकाराने ज्ञान आणि कौशल्य वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असे ज्येष्ठ पत्रकार तथा राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी प्रतिपादन केले.
महाड पत्रकार संघ आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून हेमंत देसाई बोलत होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि महाड पत्रकार संघ यांच्यामार्फत आयोजित केलेल्या पत्रकार सन्मान सोहळा या नेत्र दीपक सोहळ्या प्रसंगी व्यासपीठावर वन खात्याचे वन क्षेत्रपाल राकेश साहू, रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट च्या मनीषा नगरकर, राष्ट्रीय स्मारक व्यवस्थापक प्रकाश जमधाडे, महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते. यांच्यासह ऐतिहासिक महाड नगरीतील पत्रकार, सामाजिक क्षेत्रातील अनेक मंडळी उपस्थित होती.
यावेळी व्यासपीठावरील ज्येष्ठ पत्रकार तथा राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते यावर्षीचा स्व. रवींद्र पाटील निर्भीड पत्रकारिता पुरस्कार अलिबाग येथील ज्येष्ठ पत्रकार राजन वेलकरे यांना, स्व. डॉ.मोहम्मद शफी पूरकर स्मृती पत्रकारिता पुरस्कार मुरुड येथील पत्रकार शेख सिराज हाशम यांना, स्व. दीपक साळुंखे स्मृती पत्रकारिता पुरस्कार तळा येथील पत्रकार विराज टिळक यांना, स्व. दिपक शिंदे स्मृती पत्रकारिता पुरस्कार माणगाव येथील पत्रकार अरुण पोवार यांना बहाल करण्यात आला. तसेच महाड पत्रकार संघातील सदस्य गोपाळ कांबळे व रघुनाथ भागवत यांना मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मानित करण्यात आले.
यावेळी हेमंत देसाई यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना महाडच्या ऐतिहासिक भूमीचा उल्लेख काळकर्ते शि.म. परांजपे, दत्तो वामन पोतदार, नाना पुरोहित, मोहन धारिया, यशवंत टिपणीस यांच्या नावांचा उल्लेख करून महाड ऐतिहासिक भूमीला लाभलेले हे खरे हिरे होते. यावेळी व्यासपीठावरील मान्यवर मंडळींनी आपले मनोगत व्यक्त करताना मनीषा नगरकर, राकेश साहू यांनी आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्याबद्दल कौतुक व्यक्त करून पुरस्कार प्राप्त पत्रकारांचे अभिनंदन केले. स्वर्गीय रवींद्र पाटील निरगुडे पत्रकारिता पुरस्कार प्राप्त हालिबाग येथील पत्रकार राजन बेलकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना महाड पत्रकार संघाचे विशेष आभार मानले. महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार, उपाध्यक्ष महेश शिंदे, सचिव रोहित पाटील, खजिनदार राजेंद्र जैतपाळ, उदय सावंत, श्रीकांत सहस्रबुद्धे, रघुनाथ भागवत, निलेश लोखंडे, चंद्रकांत कोकणे, गोपाळ कांबळे, नितेश लोखंडे, योगेश भामरे, सुधीर सोनार, किशोर किर्वे आणि तुकाराम साळुंखे आधी सर्व सभासदांनी विशेष मेहनत घेऊन पत्रकार सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे सूत्रसंचालन अविनाश घोलप, तर उपस्थितांचे आभार राजेंद्र जैतपाळ यांनी मानले.















