रायगड लोकधारा वृत्तसेवा :
मुंबई प्रतिनिधी / सतिश पाटील : महिलांच्या उपचारासाठी कोट्यवधींची संपत्ती दान; 100 वर्षीय डॉ. के. लक्ष्मीबाईंची गोष्ट. डॉ. लक्ष्मी आपल्या परिचितांना स्वतःच्या हाताने पत्र लिहितात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पत्र लिहून त्यांचे कौतुक केले.
ब्रह्मपूर, ओडिशा येथून वयाचं शतक पूर्ण झाल्यावर जिथं माणसं थकतात, किंवा केवळ आपल्या भूतकाळातील आठवणीत रमलेले असतात, अशा वेळी ओडिशातील ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. के. लक्ष्मीबाई यांनी भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे आणि अभिमान व्यक्त केला जात आहे.
कदाचित यावर सहजासहजी विश्वास बसणार नाही, परंतु ओडिशातील ब्रह्मपूरच्या डॉ. के. लक्ष्मीबाई यांनी महिलांचे आरोग्य अधिक सुधारण्याच्या उद्देशाने आपली सर्व संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांनी केवळ हा निर्णयच घेतला नाही, तर त्यासाठी स्वतःचे राहते घरदेखील विकले. घर विकून आलेली 3 कोटी 40 लाख रुपयांची सर्व रक्कम त्यांनी ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था’ (AIIMS), भुवनेश्वर शाखेला दान केली आहे.”
डॉ. लक्ष्मीबाई यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले की, “ओडिशामध्ये अनेक महिलांना कर्करोगाची लागण होते, परंतु त्यांना योग्य उपचार मिळत नाहीत. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्यासाठी मी काय करू शकते, असा विचार मी केला. म्हणूनच मी माझे घर विकले आणि एम्स (AIIMS) भुवनेश्वरमध्ये ‘महिला कर्करोग उपचार केंद्र’ उभारण्यासाठी सर्व पैसे देऊन टाकले.”
या निधीमुळे ओडिशामधील महिला आरोग्य सुविधेला, विशेषतः महिलांमधील कर्करोग उपचार आणि संशोधनाला मोठी बळकटी मिळेल.
लक्ष्मी यांच्या शेजारी राहणाऱ्या डॉ. पी. भारती त्यांच्या विद्यार्थिनी होत्या.
फोटो स्रोत,Subrat Kumar Pati
फोटो कॅप्शन,लक्ष्मी यांच्या शेजारी राहणाऱ्या डॉ. पी. भारती त्यांच्या विद्यार्थिनी होत्या.
एम्स भुवनेश्वरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप परिडा म्हणाले की, “ही रक्कम कर्करोगग्रस्त महिला रुग्णांचे उपचार, संशोधन, प्रशिक्षण आणि सामुदायिक आरोग्य सेवांसाठी खर्च केली जाईल. याशिवाय, महिलांमध्ये कर्करोगाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि ‘सर्वायकल कॅन्सर’ (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) यावरील लसीकरणासाठी या पैशांचा वापर केला जाईल.”
त्यांनी पुढे असेही सांगितले की, “या रकमेतून एक कायमस्वरूपी निधी तयार केला जाईल. या निधीच्या मुदत ठेवीवर मिळणारे व्याज केवळ याच उद्देशासाठी खर्च केले जाईल.”
तसे पाहिले तर, डॉ. लक्ष्मीबाई यांनी भुवनेश्वरच्या एम्सला दान देण्याचा निर्णय अचानक घेतलेला नाही. आपल्या आयुष्यभराच्या कमाईचा विनियोग कसा करावा, की जेणेकरून समाजाला दीर्घकाळ फायदा होईल, याचा त्या बराच काळ विचार करत होत्या.
