रायगड लोकधारा वृत्तसेवा :
रायगड लोकधारा प्रतिनिधी / उरण / पनवेल : विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने शेतकरी कामगार पक्षातील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पक्षाने पनवेल महापालिकेचे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे पक्षाकडे अनुभवी आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळख असलेले राजेंद्र पाटील यांच्यासारखे पर्याय असतानाही त्यांना डावलण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेकापने म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर शेकापचे कार्यकर्ते, पदाधिकारी दबक्या आवाजात या निर्णयावर नापसंती व्यक्त करीत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र पाटील हे निवडणूक लढवण्यासाठी आग्रही नसतीलही, पण शेकापने राजेंद्र पाटील यांच्यासारख्या आक्रमक नेतृत्वाला संधी दिली पाहिजे, असे कार्यकर्ते मत मांडत आहेत.
पनवेल-उरणच्या राजकारणात एकेकाळी माजी आमदार विवेक पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व होते. पक्षातील निर्णयप्रक्रियेपासून स्थानिक निवडणुकांपर्यंत त्यांचा प्रभाव जाणवत असे. मात्र सध्या ते कार्यरत नसल्याने पक्षातील सत्तासंतुलन बदलल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या समर्थकांचा प्रभाव वाढल्याचे दिसून आले आहे.
अशा परिस्थितीत अरविंद म्हात्रे यांची उमेदवारी केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून पक्षातील बदलत्या समीकरणांचे प्रतीक मानली जात आहे. म्हात्रे हे बाळाराम पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि सध्या पनवेल महापालिकेचे नगरसेवक म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी ही बाळाराम पाटील गटाच्या वाढत्या प्रभावाची नांदी असल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र पाटील हे विवेक पाटील यांचे विश्वासू समर्थक मानले जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचे मोठे नेटवर्क असून कार्यकर्त्यांमध्येही त्यांची पकड मजबूत आहे. त्यामुळे विधान परिषदेसारख्या महत्त्वाच्या निवडणुकीत त्यांचे नाव चर्चेत असतानाही पक्ष नेतृत्वाने त्यांचा विचार न केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
विशेष म्हणजे, राजेंद्र पाटील यांना डावलले जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. मागील विधानसभा निवडणुकीतही त्यांनी शेकापकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र पक्षाने त्यांना संधी न देता प्रीतम म्हात्रे यांना उमेदवारी दिली होती. त्या वेळी उमेदवारीच्या निर्णयावरून पक्षांतर्गत नाराजी उघडपणे समोर आली होती. राजेंद्र पाटील यांनी प्रीतम म्हात्रे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला होता. निवडणुकीत प्रीतम म्हात्रे यांचा पराभव झाला आणि त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे त्या निर्णयाच्या राजकीय परिणामांबाबत आजही शेकापमध्ये चर्चा होताना दिसते.
याच पार्श्वभूमीवर विधान परिषद निवडणुकीतही राजेंद्र पाटील यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र पुन्हा एकदा त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याने पक्षातील निर्णयप्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
काही कार्यकर्त्यांच्या मते, उमेदवारी देताना राजकीय वजनापेक्षा विशिष्ट गटांच्या पसंतीला अधिक महत्त्व दिले जात असल्याची भावना पक्षात निर्माण झाली आहे.
उमेदवाराला संधी दिल्याचे पक्षाचे म्हणणे असले, तरी स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारीच्या निर्णयावरून नाराजी असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
निर्णयप्रक्रियेवर बाळाराम पाटील समर्थकांचा प्रभाव…
राजकीय जाणकारांच्या मते, माजी आमदार विवेक पाटील यांच्या अनुपस्थितीत पक्षातील नेतृत्वाचे केंद्र बदलत असून निर्णयप्रक्रियेवर बाळाराम पाटील समर्थकांचा प्रभाव वाढत आहे. अरविंद म्हात्रे यांची उमेदवारी त्याचाच एक भाग असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे शेकापमध्ये दोन वेगवेगळ्या गटांच्या अस्तित्वाची चर्चा पुन्हा रंगली आहे.
भविष्यातील वारसदाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर…
कोकण विधान परिषद निवडणुकीचा निकाल काहीही लागो, मात्र या निवडणुकीने शेकापमधील अंतर्गत सत्तासंतुलन, नेतृत्वाची दिशा आणि भविष्यातील वारसदाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. विवेक पाटील यांच्या अनुपस्थितीत पक्षाची धुरा कोणाकडे राहणार, तसेच राजेंद्र पाटील यांच्यासारख्या आक्रमक, लोकप्रयि नेत्यांना भविष्यात कितपत संधी मिळणार, याकडे रायगडच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
